*शिष्य गुरूं जवळ बसला होता. चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. गुरूंनी विचारले, काय झाले ?*
शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका माणसाने माझ्याशी खूप वाईट केले. विश्वासघात केला. मी त्याच्यासाठी सर्व केले, आणि त्याने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. मला त्याला क्षमा करता येत नाही, करायचीही नाही.
गुरू शांतपणे ऐकत राहिले. मग म्हणाले, तू त्याचे नाव मनात किती वेळा आठवतोस दिवसात?
शिष्य म्हणाला, सतत येते मनात. झोपेतही येते. गुरू म्हणाले, म्हणजे तो मोकळा आहे आणि तू त्याला मनात घेऊन फिरतोस. कोण शिक्षा भोगतो आहे?
शिष्य गप्प झाला. गुरूंनी जवळच पडलेला एक दगड उचलला आणि शिष्याच्या हातात दिला. म्हणाले, हा धर. शिष्याने धरला. पाच मिनिटे गेली. गुरू बोलत राहिले. दहा मिनिटे गेली. शिष्याचा हात जड होऊ लागला. गुरू म्हणाले, आता कसे वाटते? शिष्य म्हणाला, हात दुखतो आहे, दगड जड वाटतो.
गुरू म्हणाले, दगड तितकाच आहे जितका होता. परंतु धरून ठेवला म्हणून जड वाटतो. राग असाच असतो. त्या माणसाने जे केले ते एक क्षण होता. परंतु तू तो क्षण मनात धरून ठेवला आहेस. तो जड होतो आहे, तुला थकवतो आहे. दगड खाली ठेव.
शिष्याने दगड खाली ठेवला. हात हलका झाला. गुरू म्हणाले, क्षमा म्हणजे त्याने केलेले चुकीचे नव्हते असे म्हणणे नाही. क्षमा म्हणजे तो दगड खाली ठेवणे. त्याच्यासाठी नाही, स्वतःसाठी. शिष्य म्हणाला, परंतु गुरुदेव, क्षमा केली तर तो माणूस सुटतो असे वाटते. न्याय कोण देणार?
गुरू म्हणाले, न्याय तू देणार नाहीस, देऊ शकत नाहीस. कर्माचा हिशोब वेगळा असतो, तो चुकत नाही. ज्याने वाईट केले त्याला त्याचे फळ मिळेल, त्यासाठी तू मध्ये उभे राहण्याची गरज नाही. तू मध्ये उभा राहिलास तर तुझाच वेळ वाया जातो, तुझीच शांती जाते.
शिष्याने विचारले, क्षमा करायची कशी? मनाला सांगितले तरी मन ऐकत नाही.
गुरू म्हणाले, एकाच गोष्टीने क्षमा येते. त्या माणसाकडे एकदा वेगळ्या नजरेने बघ. त्याने जे केले ते त्याच्या वेदनेतून आले, त्याच्या भीतीतून आले, त्याच्या असुरक्षिततेतून आले. दुखलेला माणूसच दुसऱ्याला दुखवतो. तो सुखी असता तर त्याने असे केले नसते. हे एकदा जाणलेस की राग कमी होतो, कीव येते. आणि कीव आली की क्षमा येते.
शिष्य काही वेळ शांत बसला. डोळे मिटले. आत काहीतरी हळूहळू सुटत होते. घट्ट बांधलेली गाठ थोडी सैल होत होती.
गुरू पुढे म्हणाले, आणखी एक सांगतो. जे लोक आपल्याला दुखवतात ते कधी कधी आपले सर्वात मोठे शिक्षक असतात. ते आपल्यातील कमकुवतपणा दाखवतात, आपली परीक्षा घेतात, आपल्याला घडवतात. त्या माणसाने तुला विश्वासघात केला, परंतु त्यामुळे तुला कळले की माणसावर अवलंबून राहणे धोक्याचे आहे. आता तू परमेश्वरावर अवलंबून राहशील. हे त्या दुःखाने शिकवले. त्यासाठी त्याचे आभार मान.
शिष्याने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावरचा राग ओसरला होता. तो म्हणाला, गुरुदेव, आभार मानणे जड आहे, परंतु दगड खाली ठेवणे जमेल.
गुरू हसले आणि म्हणाले, तेवढे पुरेसे आहे. दगड खाली ठेवलास की हात मोकळा होतो. मोकळ्या हाताने देव धरता येतो. बंद मुठीत देव मावत नाही.
शिष्य उठला. बाहेर वारा होता, ढग होते, आणि त्या ढगांतून एक शांत प्रकाश येत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. आत किती मोकळे वाटले. तो दगड खाली ठेवला होता. हात रिकामा झाला होता. आणि त्या रिकाम्या हाताने त्याने मनातल्या मनात दत्त महाराजांना स्पर्श केला. तो स्पर्श आधी कधी इतका जवळचा वाटला नव्हता.
*॥ श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥*
*ll दत्तरुप ll*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें