कलियुगातील कुरुक्षेत्रावर
महाभारत संपले, युद्धाचा कोलाहल शांत झाला, शंख मूक झाले, रथांचे चाक थांबले आणि पांडवांच्या शिबिरात विजयाची घोषणा झाली; पण त्या शांततेत एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न आजही जिवंत आहे.
या महासंहारातून नेमके जिंकले कोण?
इतिहास सांगतो की पांडव जिंकले आणि कौरव हरले. पण जर विजयाची किंमत स्वतःचीच माणसे, आपले भाऊ, गुरु, मुले आणि मनाची कायमची शांतता असेल, तर त्या विजयाला खरोखर विजय म्हणायचे का?
महाभारत हे केवळ ५००० वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर घडलेले ऐतिहासिक युद्ध नव्हते, तर ते आजच्या मानवी मनात रोज घडणारे युद्ध आहे. कधी ते अहंकार आणि प्रेमामध्ये चालते, कधी स्वार्थ आणि नात्यांमध्ये, कधी सत्याच्या आग्रहात, तर कधी स्वतःच्या सोयीमध्ये. म्हणूनच महाभारत जितके द्वापरयुगाचे होते, तितकेच ते आजच्या कलियुगाचेही आहे.
आज आपल्याकडे तलवारी, रथ किंवा धनुष्यबाण नाहीत; पण शब्दांचे धारदार बाण आहेत, संशयाचे दाट ढग आहेत, अहंकाराच्या उंच भिंती आहेत आणि एकमेकांचा सोयीनुसार वापर करून घेण्याची वृत्ती आहे. त्यामुळे आजही युद्धे होतात—फक्त त्यांचे कुरुक्षेत्र घराच्या चार भिंतींच्या आत किंवा माणसाच्या अंतरंगात असते.
महाभारतातील नात्यांच्या ताण्याबाण्यांकडे पाहिले, तर एक सत्य स्पष्ट होते की नात्यांची खरी परीक्षा सुखाच्या दिवसांत नाही, तर संकटाच्या काळात होते. नाते केवळ रक्ताने तयार होते, पण ते टिकवून ठेवण्यासाठी विश्वास, त्याग, परस्पर आदर आणि निखळ आपलेपणा लागतो.
आपण अनेकदा नाते टिकवण्याच्या नावाखाली चुकीच्या माणसांना माफ करत राहतो आणि स्वतःला सतत दुखावून घेतो. पण स्वाभिमान गमावून, सत्याचा बळी देऊन किंवा अन्यायाला मुकसंमती देऊन जपलेले नाते हे नात्याचे रूप नसून एक मानसिक गुलामगिरी असते.
विशेषतः मतलबी नाती सुरुवातीला ओळखू येत नाहीत. जोपर्यंत तुमच्याकडून समोरच्याचा स्वार्थ साध्य होत असतो, तोपर्यंत त्याचे प्रेम आणि काळजी खरी वाटू शकते. परंतु, जेव्हा तुमच्याकडे देण्यासारखे काही उरत नाही, तेव्हाच त्या नात्याचा खरा चेहरा समोर येतो.
ज्या नात्यात सतत अपमान, मानसिक छळ आणि तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो, तेथून सन्मानाने बाजूला होणे यातच भावनिक परिपक्वता असते. प्रत्येक वेळी नाते कायमचे तोडण्याची गरज नसते, तर त्याच्या सीमा निश्चित करणे पुरेसे असते. कुणाला मनातून माफ करावे, पण त्याच्यावर पुन्हा डोळे झाकून विश्वास ठेवू नये; कुणावर प्रेम नक्की करावे, पण त्याच्यासाठी स्वतःचे अस्तित्व संपवू नये.
याच प्रवासात प्रेम आणि आसक्ती यातील सूक्ष्म फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. प्रेम माणसाच्या विचारांना प्रगल्भ करते, तर आसक्ती माणसाला अंध बनवते. धृतराष्ट्राला आपल्या मुलांवर उदंड प्रेम होते, पण दुर्दैवाने त्या प्रेमातील विवेक हरवला. त्याच्या या अंध पुत्रमोहाने न्यायाचा गळा घोटला आणि कुरुवंशाच्या विनाशाची नांदी लिहिली.
आजच्या काळातील पालकांनी आणि जोडप्यांनी यातून फार मोठा धडा घेण्यासारखा आहे. मुलांवर प्रेम जरूर करावे, पण त्यांच्या चुकीच्या हट्टांना पाठीशी घालू नये; जोडीदाराचा सन्मान करावा, पण स्वतःचा स्वाभिमान त्याच्या पायाशी तुडवू देऊ नये. अगदी मित्रावरही प्रेम असावे, पण तो जर चुकीच्या मार्गाने जात असेल, तर त्याला वेळेत रोखण्याचे धैर्य दाखवणे हेच खरे प्रेम असते.
महाभारतात वचनांना आणि प्रतिज्ञांना खूप मोठे स्थान होते, पण भीष्मांच्या प्रतिज्ञेने इतिहासाला दिलेले वळण पाहिले, तर प्रश्न पडतो की प्रत्येक वचन अगदी आंधळेपणाने शेवटपर्यंत पाळणे योग्य असते का?
जर एखादे जुने वचन किंवा दिलेला शब्द अन्यायाला जन्म देत असेल आणि निरपराधांच्या दुःखाचे कारण बनत असेल, तर त्या वचनाचा पुनर्विचार करण्याचे धैर्य दाखवणे ही काळाची गरज असते. आज आपणही अनेकदा रागाच्या किंवा भावनिक भरात, "मी पुन्हा कधीच बोलणार नाही" किंवा "तुझ्याशी माझे सगळे संबंध संपले" असे उतावळे शब्द उच्चारतो. पण जिभेवरून घसरलेला शब्द परत घेता येत नाही आणि त्याने दिलेली मानसिक जखम आयुष्यभर भरून येत नाही. म्हणून कमी बोलावे, पण विचारपूर्वक बोलावे.
अनेकदा आपल्याला वाटते की महाभारत हे केवळ दुर्योधनाच्या अहंकारामुळे घडले; पण ते एका व्यक्तीचे पाप नव्हते. ते अनेक छोट्या-छोट्या चुकांच्या साखळीमुळे घडलेले महानाट्य होते. अहंकार वाढत गेला, मत्सर पसरत गेला, अन्यायाकडे डोळेझाक केली गेली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीष्म आणि द्रोणाचार्यांसारख्या ज्ञानी आणि समर्थ लोकांनी सोयीस्कर मौन बाळगले.
अन्याय करणाऱ्यापेक्षा तो पाहून शांत राहणारा माणूस त्या व्यवस्थेचा मोठा गुन्हेगार बनतो. आजच्या घरांमध्येही अगदी हेच चित्र दिसते. कुणा एका व्यक्तीच्या हट्टापायी किंवा अहंकारापोटी संपूर्ण घरात तणाव निर्माण होतो आणि बाकीचे लोक, "आपण कशाला वादात पडायचे?" म्हणून गप्प बसतात. हे सोयीस्कर मौनच पुढे जाऊन मोठ्या दुराव्याला जन्म देते.
कोणतीही मोठी युद्धे अचानक पेटत नाहीत, तर ती छोट्या-छोट्या अन्यायांकडे आणि गैरसमजांकडे सतत केलेल्या दुर्लक्षातून तयार होतात.
म्हणून जर कलियुगातल्या कुरुक्षेत्रावरचे युद्ध टाळायचे असेल, तर मनात साठवलेला राग वेळीच संवादाच्या माध्यमातून बाहेर पडणे गरजेचे असते. मनात तुंबलेले मळभ एक दिवस विष बनून नात्याचा बळी घेते. त्यामुळे आवाज वाढवून भांडण्यापेक्षा मुद्दा स्पष्टपणे आणि शांततेने मांडणे महत्त्वाचे ठरते.
नात्यात पारदर्शकता ठेवून विश्वास जपणे, क्षमा करून भूतकाळाच्या ओझ्यातून स्वतःची मुक्तता करणे आणि वेळ पडल्यास आपल्या माणसाला त्याची चूक दाखवून देण्यासाठी कठोर होणे, ही नाती वाचवण्याची खरी सूत्रे आहेत. प्रत्येक वेळी गोड बोलणे म्हणजे चांगुलपणा नव्हे, तर प्रसंगी कटू सत्य सांगून समोरच्याला सावरणे हाच खरा आपुलकीचा धर्म आहे.
आपण अनेकदा म्हणतो की, "मला हे नाते कसेही करून जपायचे आहे", पण त्याऐवजी आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की, "मला या नात्यातील 'माणूस' जपायचा आहे का?"
कारण नात्याचे निव्वळ नाव आणि शिक्का जपताना, जर त्यातील माणूसच हरवून गेला, तर त्या पोकळ नात्याला काहीही अर्थ उरत नाही.
म्हणून मला वाटते की महाभारताची सर्वात मोठी आणि अंतिम शिकवण ही *युद्ध कसे जिंकावे, ही नसून ते युद्ध कसे टाळावे, ही आहे.* आज आपल्या हातात गदा किंवा धनुष्य नसले, तरी आपल्या मुखात शब्द आणि डोक्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे.
म्हणूनच जीवनातील प्रत्येक वादाच्या प्रसंगी स्वतःच्या अहंकाराला बाजूला सारून स्वतःला हा एकच प्रश्न विचारायला हवा—"मला हा युक्तिवाद जिंकायचा आहे की समोरचा माणूस जपायचा आहे?"
कारण स्वतःचा थोडासा अहंकार हरवून, जर एखादे नाते आणि माणूस वाचत असेल, तर तोच मानवी जीवनातील सर्वात मोठा
आणि खरा विजय असतो !
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें