*वयोवस्थाभिध शान्तिसमुच्चयः*
*शांतिक्रियेचा हेतू व महत्त्व.*
‘अमुक गृहस्थांची आज साठी शांत आहे’, ‘आम्ही काकांच्या अमृतमहोत्सवासाठी आलो होतो,’ ‘आजोबांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा थाटात पार पडला’, अशी बोलणी आपण नेहमी ऐकतो पण नेमके साठीशांत, अमृतमहोत्सवानिमित्तचे हवन, सहस्त्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने केला जाणारा याग वगैरे काय प्रकार असतात, ते कशासाठी केले जातात हे ब-याचदा ठाऊक नसते. त्यानिमित्त नातेवाईकांचे, सुह्र्ज्जनांचे एकत्र येणेच आपण लक्षात घेतो पण हे सारे विधी वा सोहळे म्हणजे केवळ ‘ Get-together’ नव्हेत. त्यामागे भारतीय संस्कृतीचा मूळ हेतू वेगळाच आहे.
भारतीय संस्कृती माणसाचे आयुर्मान १०० वर्षांचे मानते ( म्हणूनच आशीर्वाद वा शुभेच्छा ‘जीवेत शरदः शतम् अशा असतात ) यापैकी ३० वर्षापर्यंतचा काळ उलटला की पुढची २० वर्षे असते ती प्रौढावस्था. या अवस्थेत माणूस आयुष्य स्थिर होण्यासाठी खूप धावपळ करतो. त्या धावपळीचे परिणाम हळूहळू जाणवायला लागून काही ना काही बारीकसारीक व्याधींना तोंड द्यावे लागते. आयुष्य स्थिरावत असतानाच डोकवू लागणारे आजार मनात भविष्याबाबतच्या चिंता निर्माण करतात. अरिष्टांच्या चिंतेने मन व्यग्र होऊ लागते. अशा व्यग्र मनाला शांत करण्यासाठी आपल्या संस्कृतीने काही यज्ञकर्मे सांगितली. ती यज्ञकर्मे ही मनाच्या शांतीसाठी असल्यामुळे त्यांना ‘शांति’ असेच नाव मिळाले.
वयाच्या पन्नाशीपासून शंभरीपर्यंत दर ५ वर्षांनी ‘शांति’ शौनकादि ऋषींनी सांगितल्या आहेत. त्यांना ‘वैष्णवी, वारुणी, उग्ररथ, मृत्युंजय, महारथी, भैमरथी,ऐन्द्री, सहस्त्रचंद्रदर्शन, रौद्री, कालस्वरूप-सौरी, त्र्यंबक मृत्युंजय, व महामृत्युंजय अशी विविध नावे आहेत. यापैकी उग्ररथ शांती म्हणजे साठीशांत भैमरथी म्हणजे सत्तरीसाठीची शांत. व सहस्त्रचंद्रदर्शन ८० वे वर्ष लागले असता करावयाची शांत आणि महामृत्युंजय म्हणजे शंभराव्या वर्षी करायची शांत होय.
साठीच्या शांतीच्या वेळी सप्त चिरंजीवांना आवाहन करून त्यांच्याकडे आयुरारोग्य मागायचे असते. अमृत महोत्सवाच्या वेळी देवराज इंद्राकडे अरिष्ट निवारण व्हावे म्हणून प्रार्थना करायची असते.
सहस्त्रचंद्रदर्शन शांतीच्या वेळची कल्पना अशी आहे की माणूस ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करत असताना तोपर्यंतच्या आयुष्यात त्याने हजारवेळा चंद्रदर्शन घेतलेले असते. त्यावेळी शांतिक्रिया करून त्या पुढील आयुष्य निरामय होवो अशी प्रार्थना करायची असते. मात्र या शांतिच्या वेळेबाबत काही मतभेद आहेत. ८० व्या वर्षात पदार्पण करताना नव्हे तर ८० पूर्ण होऊन ८१ व्या वर्षात पदार्पणा नंतरही काही महिन्यांनी ही शांत करावी असे मत अनेकदा आग्रहपूर्वक मांडले जाते आणि त्याचे कारण दिले जाते की तोपर्यंत १००० वेळा चंद्रदर्शन पूर्ण होत नाही. यावर एक छान टिपण शौनक ऋषींच्या विवेचनाच्या आधारे ‘वयोवस्थाभिध शान्तिसमुच्चयः’ या पुस्तकात धर्मशास्त्रकोविद श्री. नारायणशास्त्री जोशी, आंजर्लेकर यांनी दिले आहे. दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षांत ९४८ चंद्रदर्शने, ७९ वर्षांमध्ये अधिक महिन्यांची सुमारे २८ चंद्रदर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणानंतर पुन्हा नव्याने होणारे चंद्रदर्शन वेगळे असल्यामुळे ती २४ चंद्रदर्शने मिळून ९४८+२८+२४= अशी १००० चंद्रदर्शने होतात असे शौनकांनी ‘ध्रुवम्’ म्हणजे निःसंशयपणे सांगितले आहे. मग ८० वर्षे ८ महिन्यांनी जो सहस्त्रचंद्रदर्शनविधी काहीवेळा केला जातो त्याचा आधार काय ? असा प्रश्न विचारला गेला तर म्हणून आंजर्लेकर शास्त्रींनी सांगितले आहे की ही जी गणना आढळते वा मानली जाते ती वैखानस गृह्यसूत्रानुसार आहे पण ती गणना ‘रविवर्षेण ’ म्हणजे सौरवर्षानुसार आहे हे जाणावे.
अर्थात असे मतभेद एखाद्या शांतिबाबत असले तरी ‘शांति ’ करावी याबाबत मतभेद नाही. या शांति कर्मात जी ६० ची, ७५ ची व ८० ची वा १०० वर्षाची व्यक्ती तिला तितक्या दिव्यांनी ओवाळणे ही आवश्यक क्रिया आहे. वाढत्या वयामुळे येणा-या अस्वस्थ मनस्थितीतून, निराशेतून बाहेर येण्यासाठी या ओवाळण्याच्या विधीचा अतिशय उपयोग होतो. आशेचे किरण नव्याने मनात मांगल्य जागवतात. बाकी वेगवेगळ्या हविर्द्रव्यांनी ( कधी तूप तर कधी तीळ वगैरे ) वेगवेगळ्या देवतांसाठी आहुती द्यायची व त्यांच्याकडे वृद्धांसाठी आयुरारोग्य मागायचे ही भारतीय संस्कृतीतली कल्पना अन्य कोणत्याच संस्कृतीत अशा प्रकारे विधिवत् प्रत्यक्षात आणली जात नाही. या शांतिच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांनाही अन्न,वस्त्र, व दक्षिणा इ. देऊन संतुष्ट केले जाते.
आज साठी, पंचाहत्तरी, असे कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. पत व प्रतिष्ठेनुसार त्यांचे उत्सवी स्वरूप कमी अधिक भडक होत राहते पण या कार्यक्रमाची आपल्या संस्कृतीची जी मूळ संकल्पना ती अनेकांना ठाऊक नसते. ती माहित व्हावी, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीतील एका मंगल परंपरेचा परिचय व्हावा यासाठीच हा सारा लेखप्रपंच!
----------------------------------------------
*शांतीचा प्रकार आणि ती वयाच्या कितव्या वर्षी करतात ?*
*१. वैष्णवी शांती.*
वय वर्षे : ५०
प्रमुख देवता : श्रीविष्णु
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु आणि पायस ( पायस म्हणजे आज्य म्हणजे तूप, चरु म्हणजे शिजवलेला भात आणि पायस म्हणजे पाणी न वापरता केवळ दुधात शिजवलेला भात (मूळस्थानी) )
*२. वारुणी शांती.*
वय वर्षे : ५५
प्रमुख देवता : वरुण
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु आणि पायस
*३. उग्ररथ शांती.*
वय वर्षे : ६०
प्रमुख देवता : मार्कंडेय
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु, दूर्वा आणि पायस
*४. मृत्युंजय महारथी शांती.*
वय वर्षे : ६५
प्रमुख देवता : मृत्युंजयमहारथ
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु आणि पायस
*५. भैमरथी शांती.*
वय वर्षे : ७०
प्रमुख देवता : भीमरथ मृत्युंजय रुद्र
हवनीय द्रव्य : घृताक्त तीळ (तुपात भिजवलेले तीळ )
*६. ऐंद्री शांती.*
वय वर्षे : ७५
प्रमुख देवता : इंद्रकौशिक
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु आणि पायस
*७. सहस्त्रचंद्रदर्शन शांती.*
वय वर्षे : ८०.
प्रमुख देवता : चंद्र
हवनीय द्रव्य : आज्य
*८. रौद्री शांती.*
वय वर्षे : ८५
प्रमुख देवता : रुद्र
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु आणि पायस
*९. सौरी शांती.*
वय वर्षे : ९०
प्रमुख देवता : कालस्वरूपसूर्य
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु आणि पायस
*१०. त्रैयंबक मृत्युंजय शांती.*
वय वर्षे : ९५
प्रमुख देवता : मृत्युंजयरुद्र
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु आणि पायस.
*११. महामृत्युंजय शांती.*
वय वर्षे : १००
प्रमुख देवता : महामृत्युंजय
हवनीय द्रव्य : समिधा, आज्य, चरु आणि पायस.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें